राक्षसभुवनच्या वाळू साठ्याचा
लिलाव रद्द करा-महेश सौंदरमल
गेवराई,(प्रतिनिधी)
गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील नियमबाह्यपणे करण्यात आलेल्या वाळू साठ्याचा लिलाव रद्द करण्यात यावा, अशी मागणी भिमशक्ती युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष महेश सौंदरमल यांनी केली आहे.
याबाबत गेवराईच्या तहसीलदारांना देण्यात आलेल्या तक्रारी अर्जात महेश मधुकरराव सौंदरमल यांनी म्हटले आहे की, गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील वाळू साठ्याचा लिलाव दिनांक २१ नोव्हेंबर २०२२ रोजी करण्यात आला. परंतु नियमानुसार या लिलावाची जाहिरात दोन वर्तमानपत्रात प्रसिद्धीस देणे आवश्यक असताना तसे न करता नियमाची पायमल्ली करून लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळे राक्षसभुवनच्या नियमबाह्य वाळू साठ्याचा लिलाव त्वरित रद्द करून शासन नियमानुसार जाहीर प्रगटन देऊन लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा भिमशक्ती युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष महेश सौंदरमल यांनी दिला आहे. तहसीलदारांना निवेदन देताना करण जाधव, फहाद चाऊस, विकी सोनवणे, गणेश कांडेकर, बाळू साळवे, प्रमोद राऊत, सचिन पवार, पंडित गाडेकर, ऋषिकेश कांडेकर, धम्मदीप वाघमारे, अमोल देवडकर आदी उपस्थित होते.