बँकेचे कर्ज फेडण्याची विवंचना, शेतकऱ्याने स्वतःच्या आयुष्याची दोर कापली
जातेगाव : दत्ता वाघमारे
भारतीय स्टेट शाखा गेवराई बँकेकडून घेतलेले दोन लाख सत्तर हजार रुपये कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून एका ५२ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गेवराई तालुक्यातील मारफळा येथे घडली आहे. या घटनेमुळे मारफळा गावावर शोककळा पसरली आहे. भीमराव देवराव कुठे वय वर्ष ५२ असे आत्महत्या केलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे. गेवराई तालुक्यातील मारफळा येथील अल्पभूधारक शेतकरी भीमराव देवराव कुठे यांनी भारतीय स्टेट बँकेकडून आपल्या शेतीवर २ लाख ७० हजार रुपये कर्ज घेतले होते. मात्र, मागील वर्षी खरीप हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. यासोबतच रब्बी हंगामामध्ये अवकाळी पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्याने भारतीय स्टेट शाखा गेवराई बँकेकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत शेतकरी भीमराव कुठे होते. या वर्षीचा खरीप हंगाम तोंडावर आला असताना बँकेचे कर्ज कसे फेडावे अशी चिंता त्यांना सतावत होती या चिंतेतून त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये गळफास लावून आत्महत्या केली.
कुठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर...
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाने बँकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत आत्महत्या केल्याने कुठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सदरील घटनेमुळे मारफळा गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.