बँकेच्या व खाजगी सावकाराच्या कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
बागपिंपळगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या; बँकेचे व खाजगी सावकाराचे होते कर्ज
गेवराई : प्रतिनिधी
बँकेच्या व खाजगी सावकाराच्या कर्जास कंटाळून एका ३० वर्षी शेतकऱ्याने घरातील पत्राच्या आडुला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दि.२८ रोजी सकाळी सातच्या सुमारास तालुक्यातील बागपिंपळगाव येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील बागपिंपळगाव येथील रहिवासी रमेश नामदेव पिंगळे शेती करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. त्यांच्याकडे बँकेचे व खाजगी सावकाराचे कर्ज होते. त्यांच्या मागे बॅंकेचा व खाजगी सावकाराचा सततचा कर्ज मागणीचा तगादा होता. त्यांची आई नातेवाइकाकडे गावी गेलेली होती व वडील खाजगी जागेवर वाचमन म्हणून कामाला गेले होते. तर लहान मुलगा व पत्नी आपल्या माहेरी गेले होते. याचा फायदा घेऊन त्यांनी घरातील पत्राच्या आडुला दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी वडील वाचमनचे काम करुन घरी आल्यावर रमेश पिंगळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनात आल्यास त्यांनी तात्काळ यांची माहिती गावकऱ्यांना देताच गावात खळबळ उडाली. व या घटनेची माहिती गेवराई पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा करुन पुढील कारवाई साठी त्याचे शव गेवराई उपजिल्हा रुग्णालय गेवराई येथे नेण्यात आले असून रमेश पिंगळे यांच्या पश्चात त्यांना एक मुलगा, पत्नी,आई, वडील असा परिवार आहे.
